#ESADay - मुंबई इंडियन्ससाठी मनाच्या अगदी जवळचा सामना

प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्स परिवारासाठी एक खास सामना असा असतो, जो स्कोअरकार्ड आणि गुणतालिकेपलीकडे जातो. हा सामना ESA (Education and Sports for All - सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा) Day म्हणून ओळखला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण मनांना सक्षम करणे, त्यांच्या महत्त्वाकांक्षेला प्रेरणा देणे आणि खेळ व शिक्षणाचा आनंद त्यांच्या मनात रुजवणे, हे ध्येय प्रत्यक्षात आणले जाते. हा दिवस क्रिकेटपलीकडचा असतो. या दिवशी मुलांना वानखेडे स्टेडियमवर आमंत्रित केले जाते, जेणेकरून ते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना पाहू शकतील आणि त्यांच्यासाठी जल्लोष करू शकतील. मुंबई इंडियन्स त्यांना आयुष्यात एकदाच मिळणारा असा अनुभव देते, जो ते आयुष्यभर जपून ठेवतील; कारण त्यांना आपले सुपरहिरो प्रत्यक्ष मैदानात खेळताना पाहायला मिळतात. 😁💙

खेळाडूंसाठीही हा सामना वेगळीच भावना घेऊन येतो. ते फक्त चाहत्यांसमोर खेळत नसतात; ते तरुण स्वप्न पाहणाऱ्या मुलांसमोर खेळत असतात. गेल्या काही वर्षांत #ESADay हा आयपीएलमधील सर्वात भावनिक परंपरांपैकी एक बनला आहे. ज्युनियर पलटनचा आवाज आणि उत्साह अतुलनीय असतो. खेळाला मैदानाच्या सीमारेषांपलीकडे जाऊन प्रेरणा देण्याची ताकद का आहे, याची आठवण तो स्टेडियममधील प्रत्येकाला करून देतो. 🔊💯

काल ईडन गार्डन्सवरील सामन्यानंतरच्या मुलाखतीत #ESADay सामन्याबद्दल आपले विचार मांडताना एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, “ईएसए सामना मुलांसाठी असतो. आम्हाला फक्त हे सुनिश्चित करायचे आहे की आम्ही मैदानात येऊन त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणू. त्यांना येऊ द्या, आम्हाला खेळताना पाहू द्या; आम्ही त्यांचे मनोरंजन करू आणि त्यांना आनंदी करू. मला वाटते, हा त्यांच्यासाठी आयुष्यभराची आठवण ठरेल.” 💙

रोहित शर्मानेही अशाच भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “शिक्षण हा आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे जगासमोर आणल्याबद्दल रिलायन्स फाउंडेशन आणि आमच्या ओनर श्रीमती नीता अंबानी यांना श्रेय द्यायला हवे. विशेषतः हजारो मुले येऊन सामना पाहतात. हा आमच्यासाठी खूप खास सामना आहे.”

“दरवर्षी आम्ही हा दिवस मुलांसाठी खूप खास करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी येऊन क्रिकेट सामना अनुभवणे ही खूप रोमांचक गोष्ट असते. फक्त त्यांच्यासाठीच नाही, तर आमच्यासाठीही; कारण आम्हाला माहीत आहे, आम्ही लहान असताना स्टेडियममध्ये प्रवेश मिळवणे किती कठीण होते आणि सामना प्रत्यक्ष पाहणे हा किती स्वप्नवत अनुभव असतो. आम्हाला त्यांना परत जाताना काहीतरी खास आठवण देऊन पाठवायचे आहे, कारण आम्ही कसे खेळतो याबद्दल ते खूप उत्साही असतात. गेल्या काही वर्षांत आम्ही पाहिले आहे की ते येतात आणि साडेतीन तास न थांबता जल्लोष करतात… जे लहान मुलांसाठी सोपे नसते. आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत, आमच्याकडे जे काही आहे ते सर्व देणार आहोत आणि ते हसतमुखाने व आनंदाने परत जातील याची खात्री करणार आहोत. त्यांच्या आठवणीत हे नेहमी राहायला हवे… की ते वानखेडेवर एक अतिशय खास सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.”