News

पहिला ओडीआय अहवालः दहाव्या विकेटच्या विस्मयकारक खेळामुळे बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

By Mumbai Indians

भारताने फक्त १८६ धावा केल्या आणि यजमान संघाने सामन्यावर वर्चस्वही गाजवले. पण आपल्या गोलंदाजांनी लढा देऊन एक अविस्मरणीय विजय मिळवायचा आटोकाट प्रयत्न केला.

बांग्लादेशच्या मेहिदी हसन आणि मुस्ताफिजूर रहमान यांच्या दहाव्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागीदारीमुळे तीन एकदिवसीय सामन्यांपैकी एक सामना जिंकला. या दोघांनी ५१ धावांची भागीदारी करून भारताकडून अक्षरशः विजय खेचून आणला.

अर्थात, भारताने समोर उभे केलेले १८६ धावांचे लक्ष्य डोंगराएवढे दिसत होते. दीपक चहरने या वाघांना पहिल्याच ओव्हरमध्ये स्विंगने धक्का दिला. त्यानंतर सिराज, सुंदर आणि शार्दुल यांनी मधल्या फळीला पूर्ण भुईसपाट केले. 

धवन आणि कोहली या भारताच्या तोफा लवकर थंडावल्या!

भारताच्या सलामी फलंदाजांना स्पिन आणि बाऊन्स देणाऱ्या या विकेटवर धावफलक हलता ठेवताना खूप अडचणी आल्या. धवन १७ चेंडूंमध्ये ७ धावा करून बाद झाला तर नऊ चेंडूंवर दोन धावा करून कोहली तंबूत परतला. बांग्लादेशी कर्णधार लिट्टन दास याने एक अप्रतिम कॅच पकडून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. हिटमॅनने आपला खास पुल शॉट मारून षटकार ठोकला. परंतु ३१ चेंडूंवर २७ धावा केल्यानंतर त्याला बांग्लादेशच्या एमव्हीपी शकीब अल हसनने बाद केले.

क्लासी राहुलचा लढा

भारत ४९/३ वर रेंगाळत असताना केएल राहुलने टायगर्सना झोडपून काढत ७० चेंडूंद ७३ धावा केल्या. त्याने पाच चौकार आणि चार षटकार फटकावून ही धावसंख्या गाठली. श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही धावांमध्ये योगदान दिले. परंतु राहुलने भारताला चांगली धावसंख्या उभारून देण्यात मोलाची कामगिरी केली. 

चहरच्या स्विंगमुळे बांग्लादेशी खेळाडूंना सहा ओव्हर्समध्ये फक्त नऊ धावा करता आल्या. एक ओव्हर शून्य धावांची होती आणि त्याने एक विकेटही घेतली. या आकडेवारीतून चहरने नवीन चेंडूने किती कहर केला हे दिसून येते. बांग्लादेशी खेळाडू विसाव्या ओव्हरपर्यंत फक्त ४ च्या रनरेटने खेळत होते.

दोन चेंडूंवर दोन खेळाडूंच्या दोन विकेट्स

शकीबची विकेट २४ व्या ओव्हरमध्ये पडल्यानंतर महमुदुल्ला आणि मुश्फिकार रहीम यांनी ३३ धावांची महत्त्वाची भागीदारी करून बांग्लादेशला ४ विकेट्समध्ये ९५ धावांवर आणून ठेवले. त्यासाठी त्यांना खूप कसरत करावी लागली.

परंतु महमुदुल्लाला ३५ व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ठाकूरने चकवले आणि त्याला बाद केले. त्यानंतर सिराजने पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मुश्फिकार रहीमचा धावांचा महाल पत्त्यांच्या महालासारखा कोसळवला. त्यानंतर भारताने पुढच्या १० धावांमध्ये आणखी तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारत आता सामना जिंकणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण टायगर्सचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता.

मेहदी हसनची आतषबाजी!

चाळीसाव्या ओव्हरमध्ये धावफलक ९ बाद १३६ वर होता. बांग्लादेशला आपला विक्रमी विजय प्राप्त करण्यासाठी ५१ धावांची गरज होती. सामना हातातून निसटल्याची भावना बांग्लादेशी चाहत्यांच्या मनात होती. परंतु टायगर्सनी अगदी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. मेहदी हसन आणि मुस्ताफिजुर रेहमान यांनी फक्त ३९ चेंडूंमध्ये धावा पूर्ण केल्या. हसनने वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन ३९ चेंडूंमध्ये नाबाद ३८ धावा पूर्ण करताना चार चौकार आणि दोन षटकार फटकावले तर फिझने दोन चौकार फटकावत ११ चेंडूंमध्ये नाबाद १० धावा केला. सामना बघता बघता फिरला.  

भारताला आता बुधवारी याच ठिकाणी दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात वचपा काढायची संधी मिळेल. 

आकडेवारी: भारतीय संघ १५२/४ वर होता. त्यानंतर अवघ्या ३४ धावांसाठी त्यांनी सहा विकेट्स गमावल्या. त्यांनी २०११ च्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १३/६ ची सर्वांत खराब कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांची आत्ताही वाईट पडझड झाली.

मेहदी हसन आणि मुस्ताफिजुर रहमान यांच्यामधील ५१ धावांची भागीदारी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० व्या विकेटची सर्वाधिक धावांची भागीदारी होती.

थोडक्यात धावसंख्या: भारत ४१.२ ओव्हर्समध्ये १८६/१० (केएल राहुल ७३, शकीब अल हसन ५/३६, इबादत हुसेन ४/४७) बांग्लादेश ४६ ओव्हरमध्ये १८७/९ (लिट्टन दास ४१, मेहदी हसन मिराझ ३८*, मोहम्मद सिराज ३/३२) बांग्लादेशचा भारतावर एक विकेटने विजय.