
ENGvIND: पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पाच विकेट्सनी पराभव
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने पाच विकेट्सने गमावला. हा सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळवण्यात आला.
या सामन्यात यजमान टीमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारताने सामन्याच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा कायम ठेवून उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केले.
पहिल्या इनिंगमध्ये यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. राहुलने ४२ धावा फटकावल्या.
कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनला खाते न उघडताच परतावे लागले. परंतु यानंतर कर्णधार शुभमन गिलने जैस्वालसोबत उत्तम फलंदाजी केली.
याच दरम्यान जैस्वालनेही आपले शतक पूर्ण केले. त्याने १०१ धावा केल्या. यानंतर मैदानात आलेल्या उपकर्णधार ऋषभ पंतनेही धावा काढणे सुरूच केले. त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी केली.
गिल आणि पंत या दोघांनीही पहिल्या इनिंगमध्ये शतकी धावसंख्या उभारली. टीम इंडियाची धावसंख्या ४३०/३ वर होती आणि टीम लवकर ऑल आऊट होईल असे वाटत नव्हते. परंतु यानंतर एकामागून एक विकेट्स पडू लागल्या आणि शेवटचे सहा फलंदाज पटापट पॅव्हिलियनला परतले.
अशा रितीने भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये ४७१ धावांवर ऑल आऊट झाली. गिलने १४७ आणि पंतने १३४ धावा केल्या.
यजमान संघाची पहिल्या डावात सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि सलामीवीर जॅक क्रॉलीला जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर बेन डकेट आणि ऑली पोप यांनी चांगली फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली.
बेन डकेटने ६२ धावा केल्या तर ऑली पोपने १०६ धावांची शतकी खेळी केली. हॅरी ब्रुकनेही चांगली फलंदाजी केली आणि त्याचे शतक फक्त एका धावेने चुकले. तो ९९ धावांवर प्रसिद्ध कृष्णाकडून बाद झाला.
इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर संपुष्टात आला आणि भारताला ६ धावांची आघाडी मिळाली.
भारतासाठी पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत त्याला जगातील नंबर वन गोलंदाज का मानले जाते हे सिद्ध केले.
दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि यशस्वी जैस्वाल फक्त चार धावा काढून बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने साई सुदर्शनसोबत धावा करायला सुरुवात केली. क्रीजवर स्थिरावलेल्या सुदर्शनला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ३० धावा काढून बाद केले.
भारताने कर्णधार गिल (८) च्या रूपात अवघ्या ९२ धावांवर तिसरी विकेट गमावली. नंतर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी चांगली भागीदारी करून संघाचा धावसंख्या २५० च्या पुढे नेली.
दुसऱ्या इनिंगमध्येही ऋषभ पंतने ११८ धावांचे शतक झळकावले, तर राहुलनेही १३७ धावांचे शतक पूर्ण केले.
हे दोन्ही फलंदाज बाद होताच टीम इंडियाचा डाव पुन्हा एकदा डळमळीत झाला आणि संपूर्ण संघ फक्त ३६४ धावांवर ऑलआउट झाला.
विजयासाठी ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. यजमान संघाचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची मोठी भागीदारी करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
टीमची पहिली विकेट जॅक क्रॉलीची पडली. त्याने ६५ धावा केल्या. यानंतर ओली पोपला प्रसिद्ध कृष्णाने ८ धावांवर बोल्ड केले आणि भारताला दुसरे यश दिले. शतकवीर बेन डकेटला शार्दुल ठाकूरने १४९ धावांवर पॅव्हिलियनला पाठवले. या वेळी टीमची धावसंख्या २५३/३ वर होती.
कर्णधार बेन स्टोक्सने ३३ धावांची छोटी पण महत्त्वाची कामगिरी केली. मग जो रूटने ५३ आणि जेमी स्मिथने ४४ नाबाद धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
इंग्लंडने पहिली कसोटी पाच विकेट्सने जिंकली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल.