INDvSL: पुन्हा एकदा सूर्य तळपला, आणखी एक शतक

INDvSL: पुन्हा एकदा सूर्य तळपला, आणखी एक शतक

By Mumbai Indians

मालिकेचा निर्णय ठरवणाऱ्या राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव पुन्हा तळपला. त्याने दिमाखदार शतक पूर्ण केले. हेच शतक भारताच्या श्रीलंकेवरील ९१ धावांच्या दणदणीत विजयाचा पाया ठरले.

हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवने नाबाद ११२ धावा करताना श्रीलंकन गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला तर शुभमन गिल, राहुल त्रिपाठी आणि अक्झर पटेल यांच्या खेळामुळे भारतीय धावसंख्या २२८/५ वर गेली.

दरम्यानच्या काळात अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्यापासून रोखले. नियमितपणे विकेट्स पडल्या आणि त्यामुळे त्यांच्या धावांच्या पाठलागाची दिशा बदलली. श्रीलंकन संघ १३७ धावांवर सर्वबाद झाला.

राजकोट येथे झालेल्या निर्णायक सामन्यातील काही क्षणचित्रे पाहूया.

संथ सुरूवातीनंतर त्रिपाठीचे फटाके

पहिल्या ओव्हरमध्ये ईशान किशनची विकेट गमावल्यानंतर श्रीलंकेला पहिले दोन ओव्हर भारतीय धावसंख्येवर दबाव ठेवणे शक्य झाले. परंतु राहुल त्रिपाठीने अत्यंत देखणा खेळ करून सर्वांची मने जिंकली.

दबावाला बळी न पडता त्रिपाठीने काही सुंदर शॉट्स खेळले आणि लंकन गोलंदाजांच्या गोलंदाजीवर पॉवर प्लेमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. गिलने दुसऱ्या बाजूने या महाराष्ट्रीय फलंदाजाची बाजू छान सावरून धरली. त्रिपाठीने १६ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. त्याच्या या खेळामुळे भारतीय संघाला सहाव्या ओव्हरपर्यंत ५० धावा पूर्ण करणे शक्य झाले.

त्रिपाठीला अर्धशतक गाठता आले नाही परंतु त्याने स्वतःचा एक ठसा उमटवला. त्याने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सगळ्यांचा दादा, सूर्यादादा!

प्रिय सूर्यकुमार यादव, तुझे कौतुक करायला आमच्याकडे पुरेसे शब्द नाहीत! श्री. ३६०, असलेल्या स्कायने पुन्हा एकदा अप्रतिम खेळ केला. तो नक्की काय खाऊन खेळायला उतरतो? तो क्रिकेटच्या देवांच्या स्वप्नातला खेळ खेळतो का? सूर्यकुमारने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पॉवर प्ले संपताना खेळायला उतरलेला सूर्यकुमार एकेकाळी फिनिशर होता. तो आता संपूर्ण फलंदाज झाला आहे. स्कायने तात्काळ फटकेबाजी सुरू केली, जागा मिळेल तिथे चेंडू टोलवले आणि गोलंदाजांना आता काय करावे, असा प्रश्न पडला.

त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहून तो क्रिकेट ०७ खेळाडू आहे आणि प्रत्येक सामन्यात आधीचा खेळ कॉपी करून पेस्ट केलाय, असेच सर्वांना वाटत होते. त्याने २०२२ मध्ये गोलंदाजांना चारीमुंड्या चित केले. आज रात्री स्काय दादाने याही वर्षात आपला हाच इरादा आहे हे स्पष्ट केले. त्याने मारलेला तो एक्स्ट्रा कव्हरवरचा शॉट फार सुंदर होता, नाही का? आणि सूर्यकुमारने असे कितीतरी शॉट्स मारले. त्याने स्कूप्सचीही सर्वांना मनसोक्त मेजवानी दिली.

सूर्यकुमारने आपले टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील तिसरे शतक बघताबघता पूर्ण केले. या स्वरूपात हे भारतासाठीचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत वेगवान शतक ठरले. आता त्याने भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची टी२०आय शतके (३) पूर्ण केली असून पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. अंतिमतः तो ५१ चेंडूंवर ११२ धावा करून नाबाद राहिला. त्याने या खेळीत सात चौकार आणि नऊ षटकार फटकावले. त्याचा स्ट्राइक रेट २१९.६० असा भरगच्च होता.

अक्झरने दिला फिनिशिंग टच

स्काय एका बाजूला एकामागून एक चौकार- षटकार मारत असताना शुभमन गिल दुसरी बाजू सावरत अर्धशतकाकडे जात होता. परंतु तो वानिंदू हसरंगाने त्याला बाद केले आणि त्यापाठोपाठ हार्दिक पंड्या आणि दीपक हूडा यांच्या विकेट्स पडल्या.

अक्झर पटेलने मात्र शेवटच्या टप्प्यात चौकारांचा पाऊस पाडत इनिंगला चार चाँद लावले. बापूने चार चौकारांसह नऊ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. त्यामुळे भारतीय धावसंख्या २० ओव्हर्समध्ये २२८/५ पर्यंत गेली.

भारताने शेवटच्या १० ओव्हर्समध्ये १३६ धावा केल्या. त्यात सूर्यकुमार यादव सर्वाधिक योगदान होते.

मेंडीसच्या खेळानंतर अक्झर, अर्शदीप यांच्या विकेट्स

श्रीलंकेचा विकेटकीपर- फलंदाज कुसल मेंडीसने धावांचा पाठलाग करताना आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले. श्रीलंकेला प्रति ओव्हर ११ धावांची गरज होती. त्यामुळे सलामी फलंदाजांना चांगला खेळ करणे गरजेचे होते. मेंडीसने ते करून दाखवले.

परंतु कोणत्याही परिस्थितीत चूक करण्याची शक्यता नसलेल्या अक्झर पटेलने मेंडीसला २३ धावांवर बाद केले आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली. दुसरीकडे अर्शदीप सिंगनेही सोबतीला येऊन पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये निसांकाचा डळमळीत खेळ एक बाऊन्सर टाकून संपुष्टात आणला.

३-०: गोलंदाजांनी खेळ गुंडाळला

भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेनंतरही दबाव कायम ठेवायला सुरूवात केली. युजवेंद्र चहल, उमरान मलिक आणि कंपनीने फक्त धावांनाच आळा घातला नाही तर त्यांनी नियमितपणे विकेट्स घेऊन श्रीलंकन फलंदाजांचा पाठलाग बांधून टाकला. पाहुण्या संघाच्या दासून शनाकासह एकाही मधल्या फळीतील फलंदाजाला भारतीय आव्हानावर मात करणे शक्य झाले नाही. उमरान मलिकने आपल्या प्रचंड वेगाने भारतीय खेळपट्टीवर प्रभाव टाकला.

अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेऊन गोलंदाजांचे नेतृत्व केले तर हार्दिक, मलिक आणि चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकन संघ १७ व्या ओव्हरमध्ये १३७ धावांवर सर्वबाद झाला.

थोडक्यात धावसंख्या: भारत २० ओव्हर्समध्ये २२८/५ (सूर्यकुमार यादव ११२*, दिलशान मदुशंका २/५५) श्रीलंका १६.४ ओव्हर्समध्ये १३७/१० धावा (दासून शनाका २३, अर्शदीप सिंग ३/२०) भारताचा ९१ धावांनी विजय.