
तुमच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा आनंद घ्याः रोहित शर्मा
भारत आता ‘कप’ सीझनमध्ये आहे आणि आता बरीच कारणे आहेत खेळण्यासाठीः दशकात प्रथमच आयसीसी चषक जिंकणे, २०११ सालापासून प्रथमच आयोजक म्हणून ओडीआय विश्वचषक जिंकणे, भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयाच्या ४०व्या वर्षात ओडीआय विश्वचषक जिंकणे.
भारत यजमान असल्याबाबत, भारतीय कर्णधारपद, वैयक्तिक कामगिरी, क्रिकेटपटू म्हणून विकास आणि फलंदाजीतील धोके इत्यादींबाबत विविध ठिकाणी चर्चा होत असताना रो- हिट शर्माने पीटीआयला (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) दिलेल्या मुलाखतीत अनेक बाबतीत चर्चा केली.
घरच्या खेळपट्टीवरील विश्वचषकात संघाचे कर्णधारपद स्वीकारण्याचा ताण
“माझ्या मते मी स्वतः किती शांत राहतो आणि बाह्य घटकांचा सकारात्मक किंवा नकारात्मक न राहण्याबाबत किती प्रभाव पडतो याचा विचार न करणे हे महत्त्वाचे आहे. मला प्रत्येक गोष्ट बाजूला सारायची आहे,” असे मत रोहितने बंगळुरूमध्ये एशिया कप कॅम्पमध्ये जाण्यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
“मी २०१९ वर्ल्ड कपपूर्वी ज्या टप्प्यात होतो त्याच टप्प्यात मला परत जायचे आहे. माझी मनःस्थिती चांगली होती. मी खूश होतो. मला तो सगळा काळ परत आणायचा आहे आणि हे करण्यासाठी पुरेसा वेळ माझ्याकडे आहे. मी २०१९ विश्वचषकापूर्वी एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून ज्या योग्य गोष्टी करत होतो त्या आठवण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्या विचार प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा जायचे आहे,” असे तो म्हणाला.
भारतीय क्रिकेटमधील त्याची महानता
“मी मागे माझ्या काय आठवणी ठेवून जाणार आहे याचा विचार करणारा माणूस मी नाही,” रोहित म्हणाला. “माझा वारसा हा लोक ठरवतील आणि त्यावर चर्चा करतील. मी यावर काहीच म्हणू शकत नाही.”
“मी आकडेवारीवर विश्वास ठेवत नाही. तुमच्यासमोर असलेला क्षण आनंदात आणि मजेत घालवला पाहिजे आणि त्या क्षणातच आपण जगले पाहिजे. मला कोणत्या गोष्टीने आनंद मिळतो याचा विचार मी करतो आहे,” तो पुढे म्हणाला.
“माझ्यासाठी हा क्षण आठवणी निर्माण करण्याचा आणि माझ्या टीममधील खेळाडूंसोबत चांगले नाते तयार करण्याचा आहे. तुम्हाला जे काही मिळते आणि जे काही तुमच्याकडे आहे त्यात तुम्ही खूश राहिले पाहिजे.”
संघ निवडीच्या प्रक्रियेत एक कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून एक क्षण अधोरेखित करा
एक कर्णधार म्हणून
“सर्वोत्तम टीम रचना निवडत असताना विविध कारणांसाठी अनेक खेळाडूंना ममागे ठेवले जाईल आणि राहुलभाई (द्रविड) आणि मी खेळाडूंना ते संघात का नाहीत याचे सर्वोत्तम स्पष्टीकरण देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.”
“आम्ही प्रत्येक निवडीनंतर आणि खेळणाऱ्या ११ च्या संघाची घोषणा झाल्यानंतर खेळाडूंशी संवाद साधला आहे. आम्ही त्यांच्याशी समोरासमोर, एकास एक अशा पद्धतीने बसून त्यांची निवड का झालेली नाही हे सांगतो,” हिटमॅन म्हणाला.
“मी, प्रशिक्षक आणि निवड समिती प्रतिस्पर्धी, खेळपट्टी, आमची ताकद, त्यांच्या कमजोरी अशा विविध गोष्टींवर विचार करून एका समान टप्प्यावर येतो. आम्ही दर वेळी बरोबरच असू असेही काही नाही.
“अंतिमतः काही लोक निर्णय घेतात आणि आपण माणूस म्हणून चुका करतोच. आपण नेहमीच बरोबर असतो असे नाही,” असे तो एक क्षण थांबून म्हणाला.
एक खेळाडू म्हणून
“२०११ मध्ये माझी निवड झाली नव्हती तेव्हा तो माझ्यासाठी अत्यंत वाईट वाटण्याचा प्रसंग होता. विश्वचषक संघात निवडले न गेल्यानंतर काय शिल्लक राहते याचा विचार मी करत होतो.”
“मी खूप दुःखी होतो आणि माझ्या खोलीत बसलो होतो. पुढे काय करायचे हे कळत नव्हते. मला आठवते युवी (युवराज सिंग) मला त्याच्या खोलीत बोलवत होता आणि जेवायला बाहेर नेत होता. तो मला म्हणाला, ‘तुझ्या पुढ्यात अजून कितीतरी वर्षे आहेत. आम्ही विश्वचषक खेळत असताना तू या संधीचा फायदा घे आणि तुझ्या खेळावर, कौशल्यांवर मेहनत करत आणि पुनरागमन कर. तू भारतासाठी खेळू शकणार नाहीस किंवा विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार नाही असे काहीच नाही.”
“मी पुन्हा फळ्याकडे गेलो. प्रचंड मेहनत केली आणि विश्वचषकानंतर ताबडतोब मी पुनरागमन केले आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी होत आहेत. मी या भावनेतून गेलो आहे आणि त्यामुळे सांगणे सोपे असते, करणे कठीण असे मला कुणी सांगू शकत नाही.”
“मला विश्वचषकातून एकदा वगळण्यात आले होते आणि ही भावना काय आहे हे मला नक्की माहीत आहे.”
फलंदाजीतील धोके पत्करण्यासाठी उत्सुक
"मला आणखी धोके पत्करायचे होते आणि त्यामुळे माझी आकडेवारी सध्या थोडी वेगळी आहे. माझा (ओडीआय) स्ट्राइक रेट (या कालावधीत) वाढला आहे पण सरासरीत थोडी घट झाली आहे. मला हेच आमचे फलंदाजी प्रशिक्षक (विक्रम राठोड) सांगत होते, ‘तू मागच्या अनेक वर्षांत ज्या प्रकारे फलंदाजी करत होतास त्यामुळे तू मोठी धावसंख्या उभारलीस आणि मागच्या काही वर्षांत हे (मोठी धावसंख्या) घडत नाहीये कारण तू धोके पत्करतो आहेस," तो म्हणाला.
"हा पूर्णपणे मी निवडलेला पर्याय होता. माझी नेहमीची फलंदाजी अजूनही माझी खास आहे पण मला काहीतरी वेगळे करून पाहायचे होते. त्या निकालांनी मी खूप खूश आहे."
"प्रत्येकाला दीर्घकाळ फलंदाजी करून १५० आणि १७० अशा धावा करायच्या असतात. मलाही हे अजूनही करावेसे वाटते पण तुम्ही आतापर्यंत जे केलेले नाही ते करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. त्यामुळे तुमच्या फलंदाजीच्या क्षमतांमध्ये वाढ होते. आपण हे करत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही.”
"मी जर खूप धोकादायक फटके मारले तर मी काही वेळा बाद होईन हे मला माहीत होते पण त्याचा विचार केला नाही. मी व्यवस्थापनाला मला असेच खेळायचे आहे हे सांगून टाकले."
भारतीय खेळपट्ट्यांचे आव्हानात्मक स्वरूप
"माझ्या भारतातील आताच्या कसोटी इनिंगकडे पाहा. परदेशी फलंदाजी करण्याच्या तुलनेत भारतात आणि विशेषतः मागच्या २-३ वर्षांत फलंदाजी करणे खूप कठीण झाले आहे हे मी नक्की सांगू शकतो. आम्ही ज्या खेळपट्ट्यांवर खेळलो त्या परदेशांच्या तुलनेत जास्त आव्हानात्मक आहेत. त्यामुळेच आम्ही धावा आणि फलंदाजी विभागाच्या सरासरीबाबत फारशी चर्चा केलेली नाही. आम्हा सर्वांना आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर खेळावे लागणार हे आम्ही स्वीकारलेले आहे. आम्ही ज्या सरासरीवर खेळ संपवणार याबाबत मला काळजी करायची गरज वाटत नाही,” रोहित म्हणाला.
"मी असा विचार करतो परंतु वेगवेगळ्या खेळाडूंची विचार प्रक्रिया वेगळी आहे आणि मला त्यात बदल करायचा नाही. मी आमच्या गोलंदाजांसाठी योग्य असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळणार आहे,” तो पुढे म्हणाला.
कर्णधारपदाचे आयुष्य (शेल्फ लाइफ)
रोहित शर्माने अत्यंत कठोर उत्तर दिले- "शेल्फ लाइफ असा काही प्रकार नसतो.”
"तुम्हाला जबाबदारी सोपवली जाते. तुम्ही निकाल देता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदारीने तुम्ही खूश आहात की नाही. शेल्फ लाइफपेक्षा हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे."
"मी प्रवाहासोबत जाणारा माणूस आहे. मला जे काही योग्य वाटते ते मी पाच किंवा सहा महिन्यांनंतर मला काय करायचे आहे त्याचा विचार न करता मी करतो. मला जशा घटना घडतात त्यानुसार वागायला आवडते परंतु भविष्यात जे काही घडेल त्यानुसार मी तयारी करतो."