News

केएल-स्कायच्या धडाकेबाज खेळामुळे भारताचा आठ विकेट्सनी विजय

By Mumbai Indians

ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळाल्यामुळे प्रचंड उत्साहात असलेल्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी२०आय सामन्यातही तोच कित्ता गिरवला. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरूवनंतपुरम येथे आयोजित पहिल्या सामन्यात त्यांनी पाहुण्या संघाला आठ विकेट्सनी पराभवाची धूळ चारली. 

केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या बॅट तळपल्या. त्यांनी प्रत्येकी अर्धशतके झळकवली तर अर्शदीप सिंगने स्फोटक गोलंदाजी करत ३.२ ओव्हर्स शिल्लक असताना भारताला विजय मिळवून दिला. 

सर्वप्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. त्यांनी फक्त नऊ धावांमध्ये पाच विकेट्स घालवल्या. त्यानंतर त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी पाहुण्या संघाच्या आशा थोड्या उंचावत त्यांच्या टीमला १०६/८ पर्यंत नेले. परंतु या धावा त्यांना अपुऱ्या पडल्या. 

नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा याने खेळणाऱ्या ११ च्या संघात काही बदल केले. 

सकाळी पाठदुखीने ग्रस्त झालेल्या जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराला या सामन्यात आराम देण्यात आला. त्याऐवजी दीपक चहर खेळायला आला. 

युजवेंद्र चहलऐवजी रवीचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आल्यानंतर खेळणाऱ्या ११ च्या संघात ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांना खेळण्याची संधी देण्यात आली. 

दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमाला झालेल्या दुखापतीतून बरा होऊन तो खेळण्यासाठी मैदानात उतरला. जूनमध्ये या दोन्ही संघात झालेल्या मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या रीझा हेंड्रिक्सला या वेळी आराम देण्यात आला. 

टीम इंडियाने आपल्या खेळाची सुरूवात एकदम धमाकेदार केली. त्यांनी पहिल्या दोन ओव्हर्समध्येच चार विकेट्स घेतल्या. 

दक्षिण आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमा पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चहरच्या इनस्विंगरला बळी पडला. त्यापूर्वी अर्शदीप सिंगने क्विंटन डे कॉक, रायली रोसोवू आणि डेव्हिड मिलर यांना दुसऱ्याच ओव्हरमध्ये परत पाठवले. 

दीपक चहरने तरूण तडफदार ट्रिस्टन स्टब्सची विकेट घेऊन टीम इंडियाला बळकटी मिळवून दिली आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तो पाच चेंडूंमध्ये फक्त शून्यावर बाद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाची आशा मंदावली. 

यजमान संघाने पॉवर प्लेच्या टप्प्यात तब्बल पाच विकेट्स घेऊन पाहुण्या संघावर प्रचंड दबाव टाकला. परंतु अष्टपैलू खेळाडू एडेन मार्क्रम आणि वायने पारवेल यांनी आपल्या बुडत्या टीमला काडीचा आधार दिला. त्यांनी सहा ओव्हरच्या शेवटी संघाची धावसंख्या ९/५ वरून ३०/५ वर आणून ठेवली.

त्यानंतर टीम इंडियाने सहावी विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेवर आणखी दबाव आणला. एडेन मार्क्रम हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर २४ चेंडूंमध्ये २५ धावा करून बाद झाला. 

दहा ओव्हर्स पूर्ण होत असताना धावफलकावर ४८/६ अशी धावसंख्या होती. 

अक्झर पटेलने १६ व्या ओव्हरमध्ये वायने पारनेलची विकेट घेतली. त्याने आपल्या टीमला नामुष्कीच्या खाईतून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करत ३७ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ १६ व्या ओव्हरमध्ये ७२/७ वर होता. गोलंदाजांनी रन रेट प्रति ओव्हर पाचच्या खालीच ठेवला. शेवटच्या चार ओव्हर्समध्ये प्रोटीआजनी त्यांचा विश्वासू फलंदाज केशव महाराजची विकेट गमावल्यानंतरही ३४ धावा जोडत भारतासमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले. 

भारताची सुरूवात थोडी डळमळीत झाली. केएल राहुल दुसऱ्या ओव्हरमध्ये अंपायर कॉलमधून थोडक्यात बचावला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. 

पहिल्या सहा ओव्हर्समध्ये भारतीय संघ फक्त १७/१ वर होता. दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले होते.

सहाव्या ओव्हरनंतर एन्रिच नॉर्ट्जेने विराट कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवत खाते उघडले. 

परंतु सूर्यकुमार यादव क्रीझवर आल्यावर सामन्याचा रंगच पालटला. 

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने सातव्या ओव्हरमध्ये दोन षटकार ठोकले आणि कॅलेंडर वर्षात भारतासाठी टी२०आयमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा (७३२) शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला. त्याने यादरम्यान एका कॅलेंडर वर्षात टी२०आयमध्ये सर्वाधिक षटकार (४५) फटकावण्याचा बहुमान मिळवला. 

केएल राहुल आणि स्काय यांनी आपली ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यामुळे यजमान संघ १३ व्या ओव्हरमध्ये विजयाच्या जवळ पोहोचला होता. या वेळी ४२ चेंडूंमध्ये फक्त ३० धावांची गरज होती. 

या दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर केएल राहुलने १७ व्या ओव्हरमध्ये एक षटकार फटकावून विजयावर शिक्कामोर्तब केले. 

थोडक्यात धावसंख्या: दक्षिण आफ्रिकेचा १०६/८ (केशव महाराज ४१, अर्शदीप सिंग ३/३२) भारताकडून ११०/२ (केएल राहुल ५१*, कागिसो रबाडा १/६) ८ विकेट्सने पराभव 

आता २ ऑक्टोबर रोजी गुवाहाटीमधील बारसापारा स्टेडियमवर दुसऱ्या टी२०आयसाठी दोन्ही संघ समोरासमोर येतील तेव्हा टीम इंडिया आपली ही विजयी घोडदौड कायम ठेवून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला टी२०आय मालिका देशांतर्गत जिंकण्यासाठी उत्सुक असेल तर पाहुणा संघ पुनरागमनासाठी प्रयत्नशील असेल.